मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीनंतरही महापौर रितू तावडेंचे BMC अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश; पालिका प्रशासनात गोंधळ
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा प्रश्न आता चांगलाच चिघळला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनामध्ये नव्याने संघर्ष उभा राहिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली असताना, दुसरीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मात्र याच बदल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला थेट पत्र धाडले आहे. एकाच विषयावर दोन परस्परविरोधी आदेश आल्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवट असताना सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदांवर कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या बदली प्रक्रियेत मोठ्या अनियमितता झाल्या असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदली आदेशांच्या अंमलबजावणीला तातडीने ब्रेक लावत तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया थांबली होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा स्थगितीचा आदेश कायम असतानाच, महापौर रितू तावडे यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना एक विशेष पत्र पाठवले आहे. म्युनिसिपल इंजिनिअर युनियन या संघटनेने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत, महापौर तावडे यांनी नियमांच्या आधारे या बदल्यांच्या आदेशांवर तात्काळ आणि योग्य ती कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आता एका बाजूला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती आणि दुसऱ्या बाजूला महापौरांचे अंमलबजावणीचे सक्त आदेश, अशा दुहेरी पेचात पालिका प्रशासन पूर्णपणे अडकले असून अधिकाऱ्यांना नेमके काय करावे असा प्रश्न पडला आहे.

إرسال تعليق